पाली/बेणसे: दि. 13 (धम्मशील सावंत) : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागलेत. राज्यात महाविकास आघाडीशी न जुळल्याने वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांची मोठी खेळी दिसून आली. मराठा समाजाच्या कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी सोपवल्याने रंगत वाढली आहे. महायुती आणि इंडिया आघाडीच्या प्रमुख पक्षाविरोधात वंचित आघाडीने ही उमेदवार दिल्याने तिरंगी लढतीचा सामना रंगणार आहे. महायुतीचे सुनिल तटकरे,महाविकास आघाडीचे अनंत गिते यांच्या लढतीत आता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची हि विशेष चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी रायगड लोकसभा उमेदवार म्हणून महाड मधील कुमुदिनी चव्हाण यांना जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांचा मतदारसंघात प्रचाराचा जोरदार झंजावत सुरु असून जनतेतून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा मिळत आहे. महाडच्या चवदार तळ्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर आणी छ. शिवाजी महाराज यांना अभिवादन करून प्रचाराला सुरवात करण्यात आली.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महिलेला दुसऱ्यांदा उमेदवारी वंचितने दिली आहे.२०१९ मध्ये सुमन कोळी यांनी वंचित तर्फे लोकसभा निवडणूक लढवली होती. कोळी याना २५ हजार मताधिक्य पडले होते.
कुमुदिनी चव्हाण यांचा जन्म पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्याच्या जवळ ओतूर गावात प्राध्यापक आर, बी, डुंबरे व आई कृष्णाबाई डुंबरे पाटील यांच्या त्या कन्या आहेत. रवींद्र चव्हाण हे पती असून वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत. कुमुदिनी चव्हाण ह्या उच्च शिक्षित असून महाड येथे मॉडर्न इंग्लिश स्कूल नावाने इंग्रजी माध्यमाची शाळा चालवत आहेत. सामाजिक कार्यातही त्यांचा हिरीरीने सहभाग असतो.
वंचित आघाडी तर्फे कुमुदिनी चव्हाण यांना रायगड लोकसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर झाली आहे. भारतीय मराठा महासंघाच्या त्या जिल्हा अध्यक्ष आहे. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाचा चेहरा यावेळी दिला आहे. गतवेळी सुमन कोळी यांनीही मतदार संघात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे यावेळी कुमुदिनी चव्हाण या बलाढ्य उमेदवारांसमोर नक्कीच आपला करिश्मा दाखवतील. असे चित्र दिसून येत आहे. चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे रायगड लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर कार्यकर्ते आंबेडकरी बहुजन समाजात देखील उत्साह आणी जोश संचारला आहे.अंदर कि बात है, तीन एम एल ए मेरे साथ है, कुमुदिनी चव्हाण यांनी हा दावा केला असल्याने याचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे. रायगड मतदारसंघात पायाभूत मूलभूत नागरी समस्या जैसे थे असून आजवरचे लोकप्रतिनिधी या समस्या सोडविण्यात अपयशी ठरले आहेत. 30 ते 40 वर्ष खासदारकी उपभोगणाऱ्या नेत्यांनी नेमका कुणाचा विकास साधला असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. कुमुदिनी चव्हाण म्हणाल्या कि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षिका असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते. मी कुणाला हरविण्यासाठी निवडणूक लढवत नाही, मी विजयासाठी उभी आहे. माझ्या कडे वोटिंग बँक मोठी असल्याने माझा विजय निश्चित आहे. विकासाच्या प्राथमिक संकल्पनेत बेरोजगारी दूर करणे, गाव खेड्या पाड्यातील जनतेला भेदसावणाऱ्या समस्या दूर करणे, पायाभूत नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून देणे. समाजातील वंचित उपेक्षित घटकाचे जीवनमान उंचावून त्यांची आर्थिक सामाजिक, शैक्षणिक प्रगती साधने, तसेच मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न, करणार असल्याचे चव्हाण म्हणाल्या.
सुनिल तटकरे व अनंत गिते मला आव्हान नाहीत, तर कोकणात बेरोजगारी, स्थलांतर मोठी समस्या असून या प्रश्नावर काम करणार आहे. वंचित घटकाला पुरेपूर न्याय देण्याची माझी भुमिका आहे. मराठा समाज, वंचित घटक, बारा बलुतेदार, मुस्लिम समाज माझ्या पाठीशी आहे. श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संधीचे सोने करणार असल्याचे कुमुदिनी चव्हाण यांनी सांगितले.







