देशातील 80 कोटी जनता दारिद्र्य रेषेखाली,अन्नासाठी मौताद, आणि अंधभक्त मोदींना म्हणतात विश्वगुरु ; अनंत गीतेंचा मोदींवर जोरदार निशाणा

पाली /बेणसे दि. 23 (धम्मशील सावंत) : रायगड लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार  अनंत गीते यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारसंघात गीतेंच्या सभांना जबरदस्त गर्दी दिसून येतंय. उल्काताई महाजन यांच्या सक्षम नेतृत्वात सर्वहारा जन आंदोलन संलग्न भारत जोडो अभियान रायगड,मतदार जागृती मेळावा इंदापूर येथे घेण्यात आला. यावेळी अनंत गिते म्हणाले की भाजप कडून देशात विकासाचा केवळ भ्रम निर्माण केला जातं आहे. वास्तव वेगळं आहे.
जाहिरात बाजी करून देशातील जनतेची फसवणूक केली जातं आहे. जनतेला मोफत धान्य देण्याची घोषणा केली जातं आहे. मोफत अन्नधान्य हा मोह जाळ आहे, जनतेला मोह दाखवला जातो,  जस उंदराला खाद्य दाखवून लालच दाखवून पिंजऱ्यात अडकवलं जातं, सापळा रचला जातो  तसाच हा सापळा  सुरु आहे. मासा जसा गळाला लावला जातो, तस काम या देशात सुरु आहे. देशातील 80 कोटी जनता दारिद्र्य रेषेखाली आहे,अन्नासाठी मौताद आहे.  आणि म्हणे विश्वगुरु असा टोला अनंत गीतेंनी  मोदींना लगावला. लोकशाहीत मतदान हा सर्वश्रेष्ठ आणि  मौलिक अधिकार आहे,मतदान विकू नका, आता काही जण पैशाच्या जोरावर मते विकत घेण्याचा प्रयत्न करतील असे सांगत गाढवाची किंमत 60 हजार, माणसाची किंमत किती,तर फक्त 2000 रुपये का, असे सांगत अनंत गीतेंनी यावेळी  गाढवाची भन्नाट गोष्ट सांगितली.यावेळी सुभाष देसाई म्हणाले की 2024 ची लोकसभा निवडणूक भ्रष्टाचार विरुद्ध सदाचार अशी आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचा घोटाळ्याचा एक डाग ही ज्यांच्यावर नाही असा स्वच्छ चरित्र्याचा लोकप्रतिनिधी संसदेत पाठवा. यावेळी देसाई यांनी सुनिल तटकरे यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले.
उल्का महाजन म्हणाल्या की देश विघातक वळणावर पोहचला आहे. आदिवासी बांधवांच्या जमीन, जंगल, जल या हक्क अधिकारावर भाजपने गदा आणली आहे. आपल्याला जगणे मुश्किल होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते लोकशाहीच्या बाजूने निवडणूक रिंगणात आहेत. आपल्याला सन्मानाने जगायचे असेल तर इंडिया आघाडीची सत्ता आली पाहिजे. लोकशाही , संविधान आणि आपले हक्क अधिकार वाचवायचे असतील तर भाजप प्रणित कोणतेही उमेदवार असतील त्या उमेदवाराला , पर्यायाने भाजपला तडीपार करा असे आवाहन  या सभेत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, अनंत गीते,उल्काताई महाजन,  शिवसेना रायगड जिल्हाध्यक्ष अनिल नवगणे, आदींसह पदाधिकारी, मान्यवर , आदिवासी बांधव उपस्थित होते.

आणखी वाचा