राजापूर, दि. २७ (प्रतिनिधी): राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द गावात पत्रकार, शेतकरी व काँग्रेसचे कार्यकर्ते सिद्धेश मराठे यांच्यावर अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. अंधाराचा फायदा घेत तीन ते चार इसमांनी हा हल्ला केल्याने राजापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिद्धेश मराठे हे सायंकाळी शिवणे खुर्द गावात गेले होते. ते घरी परतत असताना भटवाडी स्टॉपजवळ त्यांच्या मागे दोन वाहने लागली. त्यामध्ये एक पांढऱ्या रंगाची कार आणि एक थार गाडी असल्याचे सांगण्यात येत आहे. काही अंतरावरच मास्क घातलेले तीन ते चार अज्ञात इसम अचानक त्यांच्या ॲक्टिव्हा दुचाकीसमोर आले. त्यांनी मराठे यांच्या गाडीची चावी खेचून घेत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. परिसरात अंधार असल्याने हल्लेखोरांनी त्याचाच फायदा घेतला.
या हल्ल्यात सिद्धेश मराठे यांना फटके मारून त्यांच्या दुचाकीची चावी दूर फेकून देण्यात आली. त्यानंतर हल्लेखोर देवाचे गोठणेच्या दिशेने पळून गेले. मारहाणीमुळे घाबरलेल्या अवस्थेत मराठे हे कसाबसा भटवाडी स्टॉपपासून काही अंतरावर असलेल्या आपल्या घरी पोहोचले.
घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक यादव यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. यावेळी शिवणे खुर्द गावचे पोलीस पाटील आणि तंटामुक्त समितीचे अध्यक्षही उपस्थित होते. त्यानंतर उशिरा राजापूर पोलीस ठाण्यात सिद्धेश मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, राजापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच हा हल्ला झाल्याचा आरोप केला जात असून, यामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पत्रकारावर झालेल्या या हल्ल्याचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच राजापूर पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले. यावेळी नगरसेवक ॲड. जमीर खलिफे, नगरसेवक सिद्धांत जाधव, विनय गुरव, सुबोध पवार, सुलतान ठाकूर, पत्रकार सिद्धेश मराठे, राजापूर अर्बन बँकेच्या संचालिका सौ. अनामिका जाधव, नगरसेविका नेहा तानवडे, अफरोज झारी, अमिना गडकरी, सौ. जान्हवी वादक, शबाना मुल्ला, माजी संचालक वसंत आंबेलकर, शहराध्यक्ष अजीम जैतापकर, हारून साठी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी सांगितले की, राजापूर नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पत्रकार सिद्धेश मराठे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून नगराध्यक्षांच्या अभिनंदनाचे बॅनर्स फाडण्यात आले आहेत. तसेच काही नगरसेवकांना रात्री अपरात्री मोबाईलवरून धमक्या दिल्या जात आहेत. या सर्व प्रकारांचा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत असून हल्लेखोर व गुन्हेगारांचा तातडीने तपास करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
राजापूरमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष व चोख पोलीस बंदोबस्त तैनात करावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या घटनेमुळे राजापूर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलीस प्रशासनाची पुढील भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








