यमुनाबाई खेर ट्रस्टने मुलींचे वसतीगृह, मागेल त्याला शिक्षण, अन्न द्यावे – डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे आवाहन

रत्नागिरी, दि. २१ (प्रतिनिधी) : मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री (पंतप्रधान) हे उत्तम, जाणकार वकिलही होते. ते न्यायाधीशांसमोर कधीही खोटे बोलले नाहीत. सत् शील होते. महात्मा गांधीजींच्या संस्कारांमुळे व अप्पासाहेब पटवर्धनांच्या सल्ल्याने खेर यांनी यमुनाबाई खेर ट्रस्टची स्थापना केली. बी. जी. खेर यांच्यासारखा प्रामाणिक मुख्यमंत्री होणे नाही. सर्वोदय छात्रालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी याची जाणीव ठेवावी. ट्रस्ट व छात्रालयाचा २५ वर्षांनी शतक महोत्सव साजरा होईल. त्यापूर्वी संस्थेने मुलींचे वसतीगृह काढावे. वंचितांना, गरिबांना शिक्षण व अन्न द्यावे. उद्दिष्ट समोर ठेवल्यास व नियोजन केल्यास हे शक्य आहे, मीसुद्धा तुमच्या मदतीला आहे, असे प्रतिपादन साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.

आज रविवारी यमुनबाई खेर ट्रस्ट व सर्वोदय छात्रालयाच्या अमृत महोत्सव सांगता सोहळ्यात ते बोलत होते. दत्त मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते होते. तसेच ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. संदीप ढवळ, ट्रस्टच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन चाळके, सुधाताई हातणकर, विश्वस्त बाळकृष्ण शेलार, माजी विद्यार्थी सुधीर देसाई, माजी विद्यार्थी प्रतिनि

धी डॉ. श्रीपाद कोदारे, कार्यकारी विश्वस्त पांडुरंग पेठे आदी उपस्थित होते.

डॉ. लवटे म्हणाले की, श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट आणि सर्वोदय छात्रालयाचा अमृत महोत्सव साजरा होताना शतक महोत्सवापूर्वी काय केले पाहिजे. याचे नियोजन केले पाहिजे. माजी विद्यार्थ्यांकडून मदत मिळेलच, परंतु मीसुद्धा आपल्यासोबत आहे. आता जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये मुलांची फारशी संख्या नाही. खासगी शाळेत शिक्षण घेणे सर्वांना शक्य नाही. त्यामुळे वंचितांना शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. बाळासाहेब खेर यांनी मुंबईतही मोठे कार्य केले. ते न्यायाधीशांसमोर कधीही खोटे बोलले नाहीत. त्यांचे भारतातील नामवंत वकिलीचे कार्यालय होते. त्यांनी केलेल्या कार्यामुळेच चमडो वालों की वाडी खेरवाडी झाली.

या वेळी हरिश्चंद्र गीते अध्यक्षस्थानावरून म्हणाले की, सर्वोदय छात्रालयामध्ये प्रत्येक विद्यार्थी सुजाण नागरिक बनून बाहेर पडतो. तो प्रामाणिक आहे. छात्रमित्र मेळाव्यालाही माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे. प्रास्ताविकामध्ये खेर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. संदीप ढवळ यांनी संस्थेच्या कार्याची थोडक्यात माहिती सांगितली. पांडुरंग पेठे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. याप्रसंगी माजी विद्यार्थी, देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. स्मरणिका अमृतस्पर्श आणि आम्ही सर्वोदयाचे छात्र या पुस्तकाचे मान्यवरांनी प्रकाशन केले. उपाध्यक्ष जयश्री बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. मान्यवरांचा परिचय बीना कळंबटे यांनी करून दिला. श्री. पेठे यांनी आभार मानले.

तळागाळातल्या लोकांचा उदय म्हणजे सर्वोदय
अनेक लोक घर, संसारात रमतात, पण सामाजिक संस्थेत रमत नाहीत. संस्था कधी मोठ्या होतात तेव्हा पदाधिकारी झटत असतात. मी दोनशे संस्थांचा पालक आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक सांगतो, आपण सतत कार्यरत राहिले पाहिजे. माझा उदय झाला म्हणजे बाकीच्या तळागाळातल्या लोकांचाही व्हायला हवा म्हणजे सर्वोदय. या तत्त्वाने काम केल्यास आपली संस्था अधिक लोकाभिमुख होईल, असे डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले.

आणखी वाचा