कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात संकल्प दिन

रत्नागिरी, दि. १३ (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी लहान वयापासूनच लावून घ्या. मनापासून, सातत्य ठेवले पाहिजे. सवय म्हणजे सहज चांगले वर्तन ठेवणे, त्यातून यश मिळतेच. देश मोठा करण्यासाठी आजचा संकल्प दिनही महत्त्वाचा आहे, चांगल्या सवयींची साखळी बनवा म्हणजे यश मिळेल, असे प्रतिपादन डॉ. जयश्री जोग यांनी केले. कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या संकल्प दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आज शनिवारी हा कार्यक्रम झाला.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध संकल्प केले. सुरवातीला संकल्प गीतही त्यांनी म्हटले. कार्यक्रमात दुसऱ्या टप्प्यात पालकांनाही डॉ. जयश्री जोग यांनी सुरेख मार्गदर्शन करून आपल्या पाल्य गुणवान, देशहितासाठी कार्य करणारा कसा बनला पाहिजे, त्याकरिता पालक म्हणून काय केले पाहिजे, याचे मार्गदर्शन केले. व्यासपीठावर शाळेचे प्रबंधक विनायक हातखंबकर, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, इयत्ता तिसरीच्या वर्गशिक्षिका भारती खेडेकर, ईशा रायंगणकर, सोमनाथ दुकले उपस्थित होते. मंजिरी गुणे यांनी सूत्रसंचालन केले. सूर्यदेवाची सुरेख रांगोळी, सुशोभन, फुलांची आरास या वेळी केली होती.

विद्यार्थ्यांनी रोज सकाळी लवकर उठून मुखमार्जनानंतर देवाला, वडिलधाऱ्यांना नमस्कार करीन, सूर्यमंत्राचे स्मरण करीन, समंत्र सूर्यनमस्कार घालीन, अभ्यास मन लावून करीन, पानात वाढलेले सर्व पदार्थ आवडीने खाईन, चांगले तेच बोलेन, समाजातील दीन-दुबळे, दिव्यांग, गरजूंना साह्य करीन, सभोवतालच्या वृक्ष, वेलींचे संवर्धन करीन असे संकल्प केले.

आणखी वाचा