चिपळूण, दि. ०७ (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यरत असलेली मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत (चिपळूण) या कौटुंबिक सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या आषाढ पौर्णिमा, धम्मचक्क पवत्तन दिन आणि बुद्ध पुजापाठ संस्कार समारंभ नुकताच जिद्द गृहनिर्माण सोसायटी, पागझरी रोड ,चिपळूण येथे संपन्न झाला.
गेली 28 वर्ष सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,आरोग्य, साहित्य, पत्रकारिता ,पर्यावरण आणि एड्स आदी क्षेत्रात कार्यरत असलेली मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत ता . चिपळूण या कौटुंबिक सेवाभावी संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या आषाढ पौर्णिमा, धम्मचक्क पवत्तन दिन आणि बुद्ध पुजापाठ संस्कार समारंभ संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांच्या अध्यक्षतेखाली तर बुद्ध पुजापाठ आणि वर्षावास प्रबोधन संस्कार समारंभ त्रिरत्न बौद्ध महासंघ, चिपळूणचे धम्मचारी जिनरुची तथा प्रा. के.एस.सावरे सर ,डि.बी.जे महाविद्यालय चिपळूण आणि धम्मचारी अमोघ सागर(खेड) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
आषाढ पौर्णिमेला वर्षावास प्रारंभ अर्थात बौद्ध संस्कृतीचे ज्ञानपर्व सुरू होत असते ते अश्विन/ कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत सुरू राहते. या आषाढ पौर्णिमेला भगवान तथागतांनी पंचवर्गीय भिक्षुना धम्मचक्क पवत्तन सूत्राचा उपदेश केला होता. या पौर्णिमेची भगवान बुद्धांच्या जीवनातील काही अन्य घटनांची जोड लाभलेली आहे. या अनुषंगाने मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच ,खेरशेत या संस्थेने आयोजित केलेल्या संस्कार समारंभा पुर्वी धम्मचारी जिनरुची यांनी यथोचित बुद्ध पुजापाठाचे पठण करून धम्म,अधम्म आणि सदधम्म या विषयांतर्गत उपस्थित उपासक , उपासिकाना संबोधित करताना सद्यस्थितीत बुद्धधम्म हाच एकमेव वैश्विक कल्याणकारी धम्म आहे. धम्म म्हणजे प्रज्ञा, करुणा आणि शिलाचरणाची संज्ञा आहे.तर अधम्म म्हणजे अंधश्रद्धा , कर्मकाडांचे अंगी रुजलेले विषारी बीज आहे आणि सदधम्म म्हणजे मैत्रीभाव, समता, समानतेची स्वीकृत जीवनमूल्ये आहेत. यावर विस्तृत मार्गदर्शन केले तसेच अमोघसागर यांनी अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीप आषाढ अमावस्या अर्थात दीपपुजा याचे महत्व पटवून देताना, गटारी अमावस्या या शब्दाचे खंडन करून उपस्थितांची मने जिंकली.त्यानंतर मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांच्या मनोगतांनी संस्कार समारंभाची सांगता करण्यात आली , यावेळी निवृत्त सुभेदार मेजर दत्ताराम मोहिते , निवृत्त आरोग्य अधिकारी अनंत हळदे, विद्युत महामंडळाचे निवृत्त अधिकारी अशोक जाधव, परांजपे मोतीवाले हायस्कूलचे मुख्याध्यापक भाऊ कांबळे, धम्म मित्र प्रकाश पवार, सामाजिक कार्यकर्ते सुरेश जाधव, संजय पवार, मिलिंद सावंत आदी धम्म उपासकां समवेत विशेष महिला उपासिका, मुला मुलींची बहुसंख्य उपस्थिती होती. तर सुहास पवार गुरुजींनी आपल्या ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन करून साऱ्यांना मंत्रमुग्ध केले, सदर संस्कार समारंभ यशस्वी करण्याकरिता सौ. राजमुद्रा कदम , सौ. राजक्रांती तांबे, कु. संघमित्रा कदम ,कु. संघराज कदम यांनी अथक परिश्रम घेतले.








