रत्नागिरी, दि. ११ : जिल्ह्यात पावसाबरोबरच रोगराईने देखील जोर धरल्याचे चित्र दिसू लागले आहे. केवळ दाट वस्ती असलेल्या शहरांमध्ये नव्हे, तर ग्रामीण भागातही याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तालुक्यातील सैतवडे गावातील गुंबद ग्रामपंचायत हद्दीत डेंग्यूने डोके वर काढले आहे. गेल्या १५ दिवसांपासून या भागामध्ये डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. व्यवस्था असूनही व्यवस्थापन नसल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सैतवडे गावातील गुंबद परिसरात प्रत्येक घरामध्ये एक-दोन रुग्ण सापडत आहेत. मात्र आरोग्य खात्याकडून डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना कमी पडत आहे. याबाबत येथील सरपंचांकडे विचारले असता त्यांनी आरोग्य खात्याकडून औषध फवारणीसाठी औषध आलेले आहे, पण त्यासाठी लागणारा पंप उपलब्ध नसल्यामुळे फवारणी होऊ शकलेली नसल्याचे म्हटले. याबद्दल जिल्हा परिषद आरोग्य विभागाला माहिती दिल्याचेही त्यांनी सांगितले.
या परिसरातील काही रुग्ण रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल आहेत. त्यामुळे जीवितहानी झाल्यानंतरच आरोग्य विभाग याची दखल घेणार आहे का, असा संतप्त सवाल सैतवडे ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे.








