फाटक हायस्कूलमध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ

रत्नागिरी, दि. १९ : अभ्यासाबरोबर, खेळ, मस्ती करावी. मुलांनी आपल्या वयात मर्यादित व अत्यावश्यक असेल तेवढाच मोबाईलचा वापर करावा. कोवळ्या वयातील मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याची जबाबदारी पालक, शिक्षकांची आहे. कारण इंटरनेट जेवढे उपयुक्त आहे तेवढे घातकही आहे. सायंकाळच्या वेळी विद्यार्थ्यांनी संस्कृत स्तोत्र पठण, ओंकार साधना करावी. यातून मेंदूचा विकास होतो, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. योग्य व्यायाम, आहार, निद्रा आवश्यक आहे. आपलं शिक्षण हे शिक्षक व समाजाच्या मदतीने सुरू असते. त्यामुळे आपण दोन्हींचे ऋण फेडू शकत नाही, असे प्रतिपादन फाटक हायस्कूलचे माजी विद्यार्थी व डॉक्टर सुश्रुत केतकर यांनी केले. फाटक हायस्कूल येथे आयोजित पाचवी, आठवी शिष्यवृत्ती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.


या वेळी व्यासपीठावर दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब परुळेकर, कार्याध्यक्ष अॅड. सौ. सुमिता भावे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. दाक्षायणी बोपर्डीकर, मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी प्रमुख उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्याध्यापक राजन कीर यांनी प्रास्ताविकामध्ये शाळेच्या गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षकांचे कौतुक केले. शिष्यवृत्ती परीक्षा देताना वेग आणि अचूकता यांची आवश्यकता असून विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत घ्यावी, असे आवाहन केले. दाक्षायणी बोपर्डीकर यांनी सांगितले की दहावी, बारावीमध्ये गुणवत्ता यादी नसल्याने पाचवी, आठवीच्या परीक्षांमधून विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवावी. कार्याध्यक्ष अॅड. सुमिता भावे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले की, शिष्यवृत्ती परीक्षेत फाटक हायस्कूलचे नाव नेहमी अग्रेसर असते. यापूर्वी एकाचवेळी 30 हून अधिक विद्यार्थीही आले आहेत. पुढील वर्षी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा विक्रम मोडण्यासाठी मेहनत घ्यावी.
 
याप्रसंगी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. विद्यार्थी, पालकांनी प्रातिनिधीक मनोगतामध्ये शाळा व शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल आभार मानले. सौ. श्रावणी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षिका सौ. नेहा शेट्ये यांनी आभार मानले.

यांचा झाला सत्कार
इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीमधील आर्या मोहिते, अर्णव पटवर्धन, ईरा गोखले, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील पर्णिका परांजपे (राज्यात 16 वी, जिल्ह्यात प्रथम), आदित्य बनगर (राज्यात 18 वा जिल्ह्यात दुसरा) तसेच अभिराम तगारे, अद्वैत आगरे, काव्या भुर्के, सोहम मोरे, पूर्वा जोशी, श्रावणी जाधव, नवेली भिंगार्डे यांना सन्मानित करण्यात आले. एनएमएमएस शिष्यवृत्तीप्राप्त निकीता बडोले, प्रथम शिदे, सारथी शिष्यवृत्ती अर्णव साळवी, पार्थ सावंत तसेच जिल्हा परिषदेमार्फत नासा सफर करणारी शमिका शेवडे यांचा सत्कार केला.

आणखी वाचा