मुंबई, दि. ०४ (वृत्तसंस्था): लोकसभा निवडणुकींचे निकाल समोर येत असून महायुतीला मोठा धक्का बसला आहे. राज्यात महायुतीची पिछेहाट होताना पाहायला मिळत आहे. राज्यात महायुती सध्या 18 जागांवर आघाडीवर आहे तर महाविकास आघाडी ही 28 जागांवर आघाडीवर आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
शरद पवार काय म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे कष्ट घेतले त्या सर्वांचे मी आभार मानतो. देशपातळीवरचे चित्र आशादायक आहे. खासकरून उत्तर प्रदेशात तुमचे जे मत होते त्यापेक्षा वेगळा निकाल लागला आहे. त्यांना ज्या काही जागा मिळाल्या, त्याचं मार्जीन कमी आहे. आमच्या सहकार्यांनी लक्ष दिले तर येत्या काळात उत्तर भारतात चांगले यश मिळू शकते. उद्याच्या बैठकीला तातडीने जाणार आहे. या निवडणुकीत अनेक गोष्टी चांगल्या घडल्या. सगळ्या मिळून आम्ही ज्या जागा लढल्या. आम्ही सात जागांवर आम्ही पुढे आहोत. 10 पैकी 7 म्हणजे आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे.
“मी उल्लेख केला आहे, तसे आम्ही महाविकास आघाडीने जीवाभावाने काम केले पाहीजे. आज मिळालेलं यश हे एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचं यश नाही. तर हे महाविकास आघाडीचं यश आहे. मी काही कोणाशी बोललो नाही. मी फक्त काँग्रेसच्या लोकांशी बोललो आहे. मी चंद्रबाबू नायडू किंवा नितीश कुमार यांच्याशी बोलणे झालं नाही. मला कधीच यापेक्षा वेगळा निकाल लागेल असे वाटले नव्हते. आजचा निकाल हा येत्या काळात विधानसभेसाठी आम्हाला अधिक प्रेरणादायी आहे.








