वर्षभराच्या मेहनतीमुळे ४५ वर्षांनी कमळ फुलले- बाळासाहेब माने

रत्नागिरी, दि. ०४ (प्रतिनिधी): रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे कमळ ४५ वर्षानंतर फुलले त्याबद्दल खूप आनंद होत आहे. भाजपाचे मतदार, नवमतदार, महिला मतदार व योजनांच्या लाभार्थ्यांनी भाजपाला निवडून दिले आहे. या निमित्ताने कोकण विकासाला नवा आयाम मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे माजी आमदार, लोकसभा सहप्रभारी श्री. बाळासाहेब माने यांनी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर श्री. बाळासाहेब माने यांनी सांगितले की, केंद्रीय नेतृत्वाने केलेली व्यूहरचना, दिग्गज नेते नारायणराव राणे यांना दिलेले तिकीट, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, अतुल काळसेकर, राजन तेली, प्रमोद जठार, मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, सर्व आघाड्यांचे प्रमुख यांनी केलेली मेहनत यामुळे भाजपाने ही निवडणूक जिंकली आहे. आम्ही वर्षभर चांगली मेहनत घेतली होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मेरा बूथ सबसे मजबूत, नमो संवाद सभांमधून मतदारांशी साधलेला संवाद यामुळे भाजपाला ७५ हजार मतदान मिळाले आहे. हे सर्व मतदान भाजपाचेच असल्याचा दावा बाळ माने यांनी केली. तसेच नारायण राणे साहेबांचा मतदार, भाजपचा मतदार, नवमतदार, लाभार्थी, महिला मतदार यांनी भाजपाला विजयी केले. याबद्दल मी मतदारांचे आभार मानतो.

श्री. बाळासाहेब माने यांनी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक प्रक्रियेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आभार मानले. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी ही यंत्रणा सूत्रबद्ध पद्धतीने हाताळल्याबद्दल विशेष आभार मानले.

जिथे बाळ माने तिथे विजय
२०१४ मध्ये आणि २०१९ भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार विनायक राऊत विजयी झाले होते. त्यावेळीही श्री. बाळासाहेब माने यांनी त्यांच्या प्रचारात भाग घेतला होता. त्यांना रत्नागिरीतून मताधिक्य देण्यात बाळासाहेब माने यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. सत्ता नाट्यामुळे २०२४ मध्ये नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार होते व विनायक राऊत हे इंडि आघाडीकडून लढले. मात्र बाळ माने यांच्यासारखा निष्ठावंत व तळागाळात पोहोचलेला नेता राणे यांच्यासोबत असल्याने राऊत यांचा पराभव निश्चित होता, अशी चर्चा भाजपा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

आणखी वाचा