राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

आदरणीय अजितदादांचा लोकाभिमुख वारसा पुढे नेत महाराष्ट्राच्या सेवेसाठी कर्तव्य भावनेने सज्ज - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज लोकभवन येथे झालेल्या साध्या आणि सन्मानपूर्ण शपथविधी सोहळ्यात सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. यामुळे सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या असून, राज्याच्या राजकीय इतिहासात हा एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरला आहे.
या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच सुनेत्रा पवार यांचे कुटुंबीय आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
शपथ घेतल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी कार्य केले. त्यांच्या विचारांचा आणि लोकाभिमुख कार्याचा वारसा पुढे नेत ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून ही जबाबदारी कर्तव्यभावनेने स्वीकारत आहे. दादांच्या अकाली जाण्याने केवळ वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मात्र त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची प्रामाणिक बांधिलकी हाच माझा खरा आधार असल्याचे त्यांनी सांगितले.
दादांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करत राहीन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठिंबा हेच माझे सर्वात मोठे बळ असून, त्याच बळावर नव्या आशेने आणि नव्या ऊर्जेने पुढे चालत राहीन, असे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी, युवकांच्या संधींसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य असेल, असेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी तसेच देशाचे गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य शासन सदैव तत्पर राहील, असे त्यांनी सांगितले. नव्या महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडू, असा शब्दही त्यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक समता, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक समृद्धी साधण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असा निर्धार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
शेवटी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे, सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करीन, असा विश्वासही व्यक्त केला.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून, महिलांच्या नेतृत्वाला नवे बळ मिळाल्याची भावना राजकीय व सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

आणखी वाचा