IND vs SL Women’s Asia Cup Final : श्रीलंकेसमोर विजयासाठी १८४ धावांचे आव्हान; शेफाली-मानधनाची १२९ धावांची विक्रमी भागीदारी

दुबई, दि. १३ : महिला आशिया कप २०२६च्या अंतिम सामन्यात भारताची सलामीवीर शेफाली वर्माने श्रीलंकेविरुद्ध वादळी फलंदाजी करत विक्रमांची नोंद केली. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात शेफालीने अवघ्या २४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यासह महिला टी-२० आशिया कपच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम तिने आपल्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिच्या नावावर होता. मानधनाने २०२२च्या आशिया कपमध्ये २५ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. शेफालीने एका चेंडूने हा विक्रम मोडला.

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेफाली व स्मृती मानधना यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच आक्रमण करत भारताला दमदार सुरुवात करून दिली. दोघींनी अवघ्या १०.२ षटकांत भारताला १०० धावांचा टप्पा गाठून दिला. पहिल्या विकेटसाठी दोघींमध्ये १२९ धावांची भागीदारी झाली. ही महिला आशिया कपच्या इतिहासातील कोणत्याही विकेटसाठीची सर्वाधिक भागीदारी ठरली.

शेफालीने ३९ चेंडूंचा सामना करत ६८ धावांची आक्रमक खेळी केली. तिच्या खेळीत चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. स्मृती मानधनानेही ३९ चेंडूत ५९ धावांची शानदार खेळी केली. तिने ३५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. दोघींनी मिळून १४ चौकार आणि पाच षटकार लगावले.

यंदाच्या आशिया कपमध्ये शेफालीचे हे तिसरे अर्धशतक ठरले. एका आशिया कप स्पर्धेत तीन अर्धशतके करण्याच्या श्रीलंकेच्या चमारी अटापट्टूच्या विक्रमाशी तिने बरोबरी साधली. यापूर्वी अटापट्टूने २०२४च्या आशिया कपमध्ये तीन अर्धशतके केली होती.

शेफाली बाद झाल्यानंतर स्मृती मानधनाही धावबाद झाली. त्यानंतर भारताच्या धावगतीला काहीसा लगाम बसला. अखेर भारताने २० षटकांत ५ बाद १८३ धावा केल्या आणि श्रीलंकेसमोर विजयासाठी १८४ धावांचे आव्हान ठेवले. अंतिम सामन्यात शेफाली-मानधना जोडीच्या तुफानी सुरुवातीमुळे भारताने श्रीलंकेसमोर मोठे आव्हान उभे केले.

आणखी वाचा