देशाची पहिली डिजिटल जनगणना आजपासून सुरू; मोबाईलवरून ‘स्व-गणना’ची सुविधा उपलब्ध

नवी दिल्ली, दि. १ : देशातील जनगणना २०२७ प्रक्रियेचा पहिला टप्पा आज बुधवारपासून सुरू झाला असून, यावेळी पहिल्यांदाच संपूर्ण जनगणना प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबवली जाणार आहे. ही भारताची १६वी जनगणना तर स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना ठरणार आहे. विशेष म्हणजे, यंदा नागरिकांसाठी ‘स्व-गणना’ (Self Enumeration) ही सुविधा प्रथमच उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यामुळे प्रत्येकाला स्वतःची माहिती थेट ऑनलाइन नोंदवण्याची संधी मिळणार आहे.

या जनगणनेची संदर्भ तारीख १ मार्च २०२७ रोजीची मध्यरात्र निश्चित करण्यात आली आहे. मात्र लडाख, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील बर्फाच्छादित व दुर्गम भागांसाठी १ ऑक्टोबर २०२६ ही स्वतंत्र संदर्भ तारीख ठेवण्यात आली आहे. या निर्णयामुळे दुर्गम भागातील माहिती संकलन अधिक अचूकपणे करता येणार आहे.

जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिला टप्पा ‘घर सूचीकरण व गृहगणना’ (House Listing and Housing Census – HLO) म्हणून ओळखला जातो. हा टप्पा एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केला जाणार आहे. या टप्प्यात देशभरातील प्रत्येक घराची स्थिती, उपलब्ध सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, वीज, इंटरनेट, मालमत्ता आणि इतर मूलभूत बाबींची माहिती गोळा केली जाईल. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला त्यांच्या सोयीप्रमाणे ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्याआधी नागरिकांसाठी १५ दिवसांची ‘स्व-गणना’ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दुसरा टप्पा म्हणजे लोकसंख्या गणना, जो फेब्रुवारी २०२७ मध्ये पार पडणार आहे. या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीची सविस्तर माहिती संकलित केली जाईल. यात वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय, सामाजिक-आर्थिक स्थिती, स्थलांतर, प्रजनन आणि जातीनिहाय माहिती यांचा समावेश असेल. विशेष म्हणजे, या वेळी जातीनिहाय जनगणना देखील केली जाणार असल्याने सामाजिक रचनेचा अधिक अचूक डेटा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

यंदाच्या जनगणनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘स्व-गणना’ सुविधा. नागरिकांना अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वतःच आपली माहिती भरता येणार आहे. यासाठी प्रथम संकेतस्थळावर लॉगिन करून राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निवडावा लागेल. त्यानंतर कुटुंबप्रमुखाचे नाव, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी नोंदवून OTP द्वारे पडताळणी करावी लागेल. पुढे पत्ता, जिल्हा, तालुका, गाव किंवा शहराची माहिती भरावी लागेल.

यानंतर डिजिटल नकाशावर स्वतःच्या घराचे अचूक लोकेशन दर्शवावे लागेल. लाल मार्कर ड्रॅग करून घराचे स्थान निश्चित करून त्याची पुष्टी करावी लागते. त्यानंतर संपूर्ण प्रश्नावली भरावी लागते. ही प्रश्नावली सोपी आणि मार्गदर्शक सूचनांसह उपलब्ध असल्याने नागरिकांना अडचण येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व माहिती भरल्यानंतर ‘प्रिव्ह्यू’ पर्यायाद्वारे ती तपासता येते. आवश्यक असल्यास दुरुस्ती करून ड्राफ्ट सेव्ह करण्याचीही सुविधा आहे.

एकदा सर्व माहिती योग्य असल्याची खात्री पटल्यावर फॉर्म अंतिम सबमिट करावा लागतो. सबमिट केल्यानंतर फॉर्म ‘लॉक’ होतो आणि त्यात कोणताही बदल करता येत नाही. त्यानंतर नागरिकांना ‘Self Enumeration ID (SE ID)’ दिला जातो, जो SMS आणि ईमेलद्वारे प्राप्त होतो. हा आयडी पुढील संदर्भासाठी जतन करणे आवश्यक आहे.

या प्रक्रियेत एक महत्त्वाची बाब म्हणजे, एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर कुटुंबप्रमुखाचे नाव बदलता येणार नाही. तसेच प्रत्येक कुटुंबासाठी एकच मोबाईल क्रमांक वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे माहिती भरताना काळजीपूर्वक तपशील नोंदवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

राज्यनिहाय वेळापत्रकानुसार विविध राज्यांमध्ये जनगणनेचे काम टप्प्याटप्प्याने राबवले जाणार आहे. अंदमान-निकोबार, गोवा, कर्नाटक, ओडिशा, सिक्कीम यांसारख्या राज्यांत १६ एप्रिल ते १५ मे दरम्यान हाऊस लिस्टिंग होणार असून, १ ते १५ एप्रिलदरम्यान स्व-गणना सुविधा उपलब्ध असेल. तर मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड आदी राज्यांत मे महिन्यात ही प्रक्रिया पार पडणार आहे.

केंद्र सरकारने या जनगणनेसाठी सुमारे ११,७१८.२४ कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला आहे. गणकांना (enumerators) स्मार्टफोन आणि विशेष मोबाईल अ‍ॅपद्वारे माहिती संकलनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे कागदविरहित आणि अधिक अचूक डेटा संकलन शक्य होणार आहे. ही संपूर्ण प्रणाली हिंदी आणि इंग्रजीसह १६ भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, डिजिटल पद्धतीमुळे जनगणना अधिक पारदर्शक, वेगवान आणि विश्वासार्ह होईल. तसेच स्व-गणना सुविधेमुळे नागरिकांचा सहभाग वाढेल, वेळेची बचत होईल आणि अंतिम डेटा लवकर उपलब्ध होण्यास मदत होईल.

जनगणनेच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित प्रक्रिया राबवली जात असल्याने, ही जनगणना देशाच्या विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे मानले जात आहे.

स्व-गणना (Self Enumeration) करण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

स्टेप 1
[https://se.census.gov.in](https://se.census.gov.in) या संकेतस्थळाला भेट द्या किंवा लॉगिन करा.
आपले राज्य/केंद्रशासित प्रदेश निवडा आणि कॅप्चा भरा.

स्टेप 2
कुटुंबप्रमुखाचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका.
लक्षात ठेवा: एकदा फॉर्म सबमिट केल्यावर घरप्रमुखाचे नाव बदलता येणार नाही.
प्रत्येक कुटुंबासाठी एकच मोबाईल नंबर वापरावा.

स्टेप 3
आपली पसंतीची भाषा निवडा आणि मोबाईल नंबर नोंदणीसाठी OTP टाका.

स्टेप 4
आपला पत्ता भरा जिल्हा, तालुका, शहर/गाव/स्थानिक भाग आणि पिनकोड.

स्टेप 5
डिजिटल नकाशावर आपलं घर अचूकपणे दाखवा.
लाल मार्कर ड्रॅग करून आपल्या इमारतीचे स्थान निश्चित करा आणि कन्फर्म करा.

स्टेप 6
प्रश्नावली पूर्ण भरा.
मदतीसाठी टूलटिप्स, FAQs आणि आवश्यक माहिती दिलेली असेल.

स्टेप 7
आपण भरलेली सर्व माहिती तपासा (Preview).
गरज असल्यास बदल करा आणि ड्राफ्ट सेव्ह करून नंतर सबमिट करू शकता.

स्टेप 8
सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून फॉर्म सबमिट करा आणि लॉक करा.
एकदा सबमिट केल्यावर कोणतेही बदल करता येणार नाहीत.

स्टेप 9
सबमिशननंतर तुम्हाला Self Enumeration ID (SE ID) मिळेल.
हा आयडी SMS आणि ईमेलद्वारे पाठवला जाईल, भविष्यासाठी सुरक्षित ठेवावा.

आणखी वाचा