अयोध्या, दि. १६ (वृत्तसंस्था): अयोध्येतील राम मंदिर परिसरात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या एका दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे आणि आत्तापर्यंत पाच जणांना या प्रकरणात अटक केली आहे. पीडितेने कॅट पोलीस ठाण्यातल्या पोलिसांवरही काही गंभीर आरोप केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबरला पीडितेने आमच्या पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार नोंदवली. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार ती तिच्या मित्रांकडे गेली होती, विविध तारखांना गेली होती. त्यावेळी तिच्यावर तिच्या मित्रांनी आणि त्या मित्रांच्या सहकाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केला. आत्तापर्यंत आम्ही या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे, इतरांचा शोध आम्ही घेत आहोत. पोलीस अधीक्षक मधुवन सिंह यांनी ही माहिती दिली आहे. पीडितेने असं म्हटलं आहे की, एका तरुणाशी माझे प्रेमसंबंध होते, त्याने आणि त्याच्या इतर मित्रांनी माझ्यावर सामूहिक बलात्कार केला आणि त्याचा व्हिडीओ तयार केला. तसंच त्याद्वारे मला ब्लॅकमेल करुन विविध ठिकाणी बोलवून अनेक दिवस सामूहिक बलात्कार केला. मी २ सप्टेंबरला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पण पोलिसांनी मला माध्यमांपासून दूर राहा, तुझ्या कुटुंबीयांनाही बजावून सांग अशी धमकी दिली. असंही या पीडितेने म्हटलं आहे.
पीडिता म्हणाली, मी श्रीराम मंदिर परिसरात स्वच्छता करण्याचं काम करते. मात्र माझ्याबरोबर जी घटना घडली त्यामुळे माझं कामही सुटलं आहे. माझी एका तरुणाशी ओळख झाली, त्याच्याशी माझे प्रेमसंबंध जुळून आले. त्यानंतर एक दिवस तो त्याच्या मित्रांना घेऊन आला आणि त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मी त्याला धुडकावून पळून जात होते तेव्हा मी खाली पडले आणि माझ्या डोक्याला लागलं ज्यामुळे मी बेशुद्ध झाले, मी बेशुद्ध असताना माझ्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिथे वंश चौधरी आणि विनय हे दोघं होते. ज्यानी मला गेस्ट हाऊसवरून गॅरेजवर नेलं. तिथेही माझ्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडीओ शूट केला. त्यानंतर मला ते ब्लॅकमेल करु लागले. असं या तरुणीने तक्रारीत सांगितलं.
मला वारंवार ब्लॅकमेल करण्यात आलं असंही तरुणीने सांगितलं तसंच तरुणी पुढे म्हणाली, व्हिडीओ पोस्ट करण्याची धमकी देत ते लोक मला वारंवार ब्लॅकमेल करत होते आणि माझ्यावर बलात्कार करत होते. मला २२ ते २४ तारीख अशा दोन दिवशी तर त्यांनी सोडलंच नाही. यानंतर मी २८ ऑगस्टला पोलीस ठाण्यात जात होते पण मला धमकी देण्यात आली. मला सांगितलं की तू पोलिसात गेली तर आम्ही तुझ्या बहिणींवरही बलात्कार करु. तसंच तुझ्या घरातल्यांनाही आम्ही सोडणार नाही. मी पोलिसांकडे दाद मागायला आले तेव्हा मला ३६ तास बसवून ठेवण्यात आलं. तसंच मला FIR ची कॉपीही देण्यात आली नाही. असाही आरोप या तरुणीने केला आहे. आज तकने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.