निसर्गाचे चक्र बदलत असताना २०२६ चा उन्हाळा आपल्यासमोर आरोग्याचे एक मोठे आव्हान घेऊन उभा आहे. ‘सुपर एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता असली, तरी घाबरून न जाता ‘योग्य खबरदारी आणि योग्य आहार’ यांच्या जोडीने आपण या उन्हाळ्यावर सहज मात करू शकतो. ‘हीट वेव्ह’कडे स्वतःच्या आणि पर्यावरणाच्या आरोग्याप्रती अधिक जागरूक होण्याची आवश्यकता आहे.
उन्हाळ्याला बनवूया सुरक्षित; या ५ सूत्रांचा करा अवलंब:
१. पाण्याचे ‘सुरक्षा कवच’ ठेवा
उन्हाळ्यात शरीरातील ओलावा (Hydration) टिकवणे हाच सर्वात मोठा बचाव आहे.
तहान लागण्याची वाट न पाहता दर अर्ध्या तासाने पाणी प्या.
ताक, लिंबू सरबत, शहाळ्याचे पाणी आणि पन्हे यांसारख्या पारंपरिक भारतीय पेयांना प्राधान्य द्या. ही पेये केवळ तहान भागवत नाहीत, तर शरीरातील खनिजेही टिकवून ठेवतात.
२. पोशाख आणि वेळेचे नियोजन
बाहेर पडताना सुती आणि फिकट रंगाचे कपडे निवडा, जे सूर्याची उष्णता शोषून घेत नाहीत.
डोक्यावर टोपी किंवा रुमाल असणे हा ‘उष्माघाता’वरचा सर्वात सोपा उपाय आहे.
शक्य असल्यास महत्त्वाची कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा पूर्ण करा, जेणेकरून दुपारी १२ ते ३ या प्रखर उन्हापासून तुमचा बचाव होईल.
३. आहारातून मिळवा थंडावा
पचायला जड असलेले तेलकट आणि प्रथिनयुक्त पदार्थ कमी करून हलका, ताजा आहार घ्या.
फळांचा समावेश वाढवा. शिळे अन्न खाणे टाळा, कारण उन्हाळ्यात अन्नातून विषबाधा होण्याचा धोका जास्त असतो.
४. घराला ठेवा ‘कुल’ (Cool)
दुपारी खिडक्यांना पडदे लावून उष्णता बाहेर रोखा आणि रात्री थंड हवा येण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा.
घरातील लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्याची विशेष विचारपूस करा.
५. माणुसकीचे छोटे पाऊल
आपण सुरक्षित असताना मुक्या प्राण्यांचा विसर पडू देऊ नका. घराबाहेर किंवा बाल्कनीत पक्ष्यांसाठी पाण्याचे छोटे भांडे ठेवा. तुमची ही छोटीशी कृती निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करेल.
उष्माघात: लक्षणे ओळखा आणि वेळीच सावध व्हा
जर कोणाला चक्कर येणे, त्वचा कोरडी पडणे किंवा तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर तो उष्माघात असू शकतो. अशा वेळी:
व्यक्तीला तातडीने सावलीत न्या.
थंड पाण्याने अंग पुसून घ्या.
तातडीने १०८ हेल्पलाईनवर कॉल करा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वाढते तापमान हे केवळ हवामानाचे बदल नसून आपल्याला निसर्गाकडे परतण्याची आठवण करून देणारे संकेत आहेत. झाडे लावा, पाणी वाचवा आणि या उन्हाळ्यात स्वतःसोबतच इतरांच्याही आरोग्याची काळजी घ्या.
निश्चय करूया, सुरक्षित राहूया!
– प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी








