मुंबई, दि. ०३ : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले. नदी-नाल्यांना पूर आला, शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्ग पावसाचा निरोप कधी होणार याकडे डोळे लावून बसला आहे. यावर भारतीय हवामान विभागाने महत्वाची माहिती दिली असून येत्या ८ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून माघारी फिरण्यास सुरुवात करेल अशी शक्यता वर्तवली आहे.
२ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हा पाऊस प्रामुख्याने दुपारनंतर मेघगर्जनेसह होणार असून, सर्वाधिक शक्यता विदर्भात आहे. काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
७ ऑक्टोबरपासून हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल, तर ८ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून हळूहळू बाहेर पडणार आहे. काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सूनचा निरोप होईल.
यंदाचा पावसाचा अहवाल
यंदाच्या हंगामात (१ जून ते ३० सप्टेंबर) महाराष्ट्रात १२० टक्के पाऊस नोंदला गेला असून तो सरासरीपेक्षा जास्त आहे.
मराठवाडा : ३९% जास्त पाऊस (अपेक्षित ६४२.८ मिमी, प्रत्यक्षात ८९७.३ मिमी)
मध्य महाराष्ट्र : २०% जास्त पाऊस (अपेक्षित ७४७.४ मिमी, प्रत्यक्षात ८९७.३ मिमी)
कोकण-गोवा : १५% जास्त पाऊस
विदर्भ : १४% जास्त पाऊस
गेल्या वर्षीही राज्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे २६% पाऊस झाला होता. सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
एल-निनो आणि पुढील हंगाम
विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या तटस्थ एल-निनो स्थिती आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान ला-नीना स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. हिंद महासागरातील इंडियन ओशन डायपोल (IOD) स्थिती सध्या सौम्य ऋण स्वरूपात असून, हंगामात तशीच कायम राहणार आहे.
ऑक्टोबरमध्ये अधिक पावसाची शक्यता
हवामान विभागानुसार ऑक्टोबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा ११५% अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याच महिन्यात दिवसाचे कमाल तापमान किंचित कमी तर किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
👉 यंदा पावसामुळे राज्यातील जलसाठा भरून निघाला असला तरी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, रस्ते आणि घरांची पडझड यामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. आता मान्सूनच्या निरोपाची उलटी गणती सुरू झाली आहे.