चिपळूण, दि. २१ (राजक्रांती कदम): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका हाकेला प्रतिसाद देऊन पाच लाख अनुयायांनी बौद्धधम्माची दिशा घेतली. हा अविस्मरणीय दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन अर्थात अशोका विजयादशमी. या धम्मक्रांती दिनानिमित्त चिपळूण तालुक्यातील खेरशेत येथे दि. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मुक्तीच्या खऱ्या मार्गावरून पादाक्रांत करताना गेली अनेक वर्ष रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुका बौध्दजन हितसंरक्षक समिती, गावशाखा खेरशेत ग्रामीण विभागीय धार्मिक संघटनेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन अर्थात अशोका विजयादशमी दिन साजरा करण्यात येत आहे.
या दिनाप्रसंगी सकाळी १०.३० वाजता धम्म ध्वजारोहण, बुद्ध पूजापाठ आणि मार्गदर्शनपरत्वे प्रबोधन विचार पिठाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष सन्मा. सुनील शंकर कदम यांच्या अध्यक्षतेखाली त्याचप्रमाणे खेरशेतचे ज्येष्ठश्रेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि प्रेरणास्थान सन्मा. काशीराम कदम गुरुजी व यशोधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सन्मा. शैला बालाजी कदम यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.
या धार्मिक कार्यक्रमानंतर खुल्या प्रबोधन पर्वाच्या दुसऱ्या सत्रात चिपळूण तालुक्यातील सुपरिचित अॅड. अशोक निकम यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि धम्मक्रांती तसेच शिक्षक समुपदेशक प्रा. मिलिंद कडवईकर (राज्याध्यक्ष, अक्षर मानव माध्यमिक शिक्षक विभाग) यांचे बौद्धधम्म आणि तरुणाई समोरील आव्हाने या विषयी उपस्थितांना संबोधित करणार आहेत.या धम्मविचार अभियानात समस्त बंधु भगिनींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे धम्मभूषण विकास संघ, खेरशेत (मुंबई) या संघटनेचे माजी अध्यक्ष आणि मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम कळवित आहे.








