मुंबई, दि. १८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला मुंबई महानगर प्रदेशात महत्त्वपूर्ण गती मिळत असून, ‘सुविधा केंद्र’ हा उपक्रम स्वच्छतेचा प्रभावी आणि आदर्श मॉडेल ठरत आहे. शहरी झोपडपट्टी व वंचित वस्त्यांमध्ये स्वच्छता, आरोग्य आणि पाणी-बचतीसाठी सार्वजनिक–खाजगी भागीदारीत सुरू झालेल्या या प्रकल्पाने अल्पावधीत उल्लेखनीय परिणाम साधले आहेत.
हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त सहकार्याने उभारलेल्या २३ सुविधा केंद्रांपैकी सर्व केंद्रे सध्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. २४ वे केंद्र सुरू होण्याच्या मार्गावर आहे, तर आणखी दोन केंद्रांचे बांधकाम सुरू असून सात प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात आहेत. पुढील काही वर्षांत एचएसबीसी, जेएसडब्ल्यू फाउंडेशन व इतर संस्थांच्या सहभागातून या योजनेचा अधिक विस्तार अपेक्षित आहे.
या केंद्रांद्वारे ५.५ लाखाहून अधिक नागरिकांनी थेट स्वच्छतेच्या सुविधांचा लाभ घेतला आहे. झोपडपट्टी भागातील महिलांसाठी सुरक्षित शौचालये, मुलांसाठी स्वच्छ जागा, दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा — या माध्यमातून ‘सुविधा केंद्र’ उपक्रमाने सुरक्षित आणि सन्मानजनक स्वच्छतेचा नवा मानदंड निर्माण केला आहे.
या केंद्रांमुळे स्थानिक आरोग्यावरही मोठा सकारात्मक परिणाम झाला आहे. प्राप्त आकडेवारीनुसार जठरांत्र, अतिसार आणि मूत्रमार्ग संक्रमणासह प्रमुख पाण्यातून पसरणाऱ्या आजारांत ५० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. झोपडपट्टी भागांतील आरोग्यधोका कमी करण्यास या प्रकल्पाने महत्त्वाची मदत केली आहे.
स्वच्छता व पर्यावरणीय टिकाव साधताना स्थानिक महिलांचा सहभाग ही या योजनेची खास वैशिष्ट्ये ठरली आहेत. प्रशिक्षित ३०० महिलांनी राबविलेल्या वर्तनबदल मोहिमेमुळे ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे प्रशिक्षण देण्यात आले असून, नागरिकांच्या दैनंदिन सवयींमध्ये सकारात्मक परिवर्तन दिसून येत आहे.
आर्थिकदृष्ट्या हा उपक्रम अत्यंत मजबूत ठरला असून, प्रत्येक सुविधा केंद्र सुरू झाल्यानंतर नऊ महिन्यांत स्वतःचा खर्च भागवू लागते. सध्या कार्यरत सर्व २३ केंद्रे पूर्णपणे स्वयंपूर्ण झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या प्रकल्पाचे कौतुक करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुंबईसारख्या प्रचंड लोकसंख्येच्या महानगरात स्वच्छता हा केवळ सोयीचा नव्हे तर सन्मानाचा प्रश्न आहे. सुविधा केंद्र मॉडेलने सार्वजनिक–खाजगी भागीदारीतून उत्कृष्ट कामगिरी कशी करता येते याचे प्रेरक उदाहरण निर्माण केले आहे. शहरातील आरोग्य सुधारण्यात या केंद्रांचे योगदान लक्षणीय आहे. भविष्यात आणखी सुविधा केंद्रे सुरू करण्याचा विचार आहे.”
स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणीय टिकावाकडे वाटचाल करत ‘सुविधा केंद्र’ उपक्रमाने शहरी महाराष्ट्रासाठी एक आदर्श आणि प्रभावी मॉडेल निर्माण केल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.








