बालवयात असतानाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटिशांचे पारतंत्र्य अस्वस्थ करत होते. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे कृतीशील मार्ग तर अवलंबिले होतेच परंतु आपल्या भावनांना व्यक्त करण्यासाठी साहित्यातूनही वाट मोकळी करून दिली. त्यातूनच त्यांनी प्रतिभासंपन्न साहित्यकृती बहरत गेली. वैविध्यपूर्ण काव्यसंपदादेखील दिसून येत होती. शत्रूचा बिमोड करून भारतमातेला ब्रिटिशांच्या पाशातून मुक्त करायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनुसारच लढा दिला पाहिजे, हा क्रांतिकारी विचार त्यांच्या मनात सतत येत असे. त्या भावनांना त्यांनी महाराजांवरील आरती आणि त्यांच्या वीर सरदारांच्या पोवाड्यांतून व्यक्त केले. शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्य आणि रणनीतीचा आधार घेत तसेच नरवीर तानाजी, बाजीप्रभू देशपांडे या मावळ्यांच्या पराक्रमांना काव्यातून साकारत क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. ब्रिटिश सत्तेला उलथवून टाकण्यासाठी ही जहाल आणि आक्रमक शिवकाव्ये क्रांतिकारी ठरत होती. अखेर त्याचा वाढता प्रभाव ध्यानात घेत ब्रिटिशांनी त्यांच्यावर बंदी आणली. पण देशभक्तांनी अगोदरच मुखोद्गत केल्यामुळे अनेक दशकांचा कालावधी उलटल्यानंतरही हे साहित्य अजरामर ठरले. या साहित्यावरील बंदी ब्रिटिश सरकारच नव्हे तर पहिल्या काँग्रेस मंत्रिमंडळानेही ही उठवली नाही. कारण त्यात हिंसा आहे, असे त्यांचे म्हणणे असायचे. पण लोकांचा आग्रह पराकोटीला गेल्यामुळे ११ नोव्हेंबर १९११ या दिवशी सरकारी पत्रकान्वये दंडनीय अपराध ठरवल्या गेलेल्या पोवाड्यावरील बंदी ७ ऑक्टोबर १९३८ रोजी उठवण्यात आली. मात्र पुणे नभोवाणीवर त्याचे पहिले सादरीकरण व्हायला २६ जानेवारी १९६४ चा दिवस उजाडावा लागला. आज शतकाहून अधिक काळ उलटला असला तरी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची शिवकाव्ये अजूनही राष्ट्रभक्ती अधिकाधिक वृद्धिंगत करणारी आहेत.
ब्रिटिशांच्या काळात क्रांतिकारी विचारांचा अवलंब करणे तसेच जहाल विचारांनी त्यांच्याविरोधात क्रांति करणे हा साहजिकच राजद्रोह समजला जात असे. अशावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महाराजांची आरती आणि नरवीर तानाजी, बाजीप्रभू यांच्यावरील पोवाडे लिहून लोकांची मानसिकता स्वातंत्र्ययुद्धाच्या दिशेने नेली होती. त्यांचे पहिले शिवकाव्य म्हणजे शिवाजी महाराजांची आरती. इतका पराक्रमी आणि प्रेरणास्त्रोत असलेला राजा जनतेसाठी देवासमान आहे. त्याची आरती असायलाच हवी, या विचारातून त्यांनी ती साकारली. पुणे येथे १९०२ साली लिहिलेली ही आरती फर्ग्युसन महावद्यालयातील आर्यन संघ नावाच्या भोजन संघामध्ये प्रत्येक आठवड्यास म्हटली जात असे.
जयदेव जयदेव जय जय शिवराया | या या अनन्य शरणा आर्यां ताराया, अशा वीररस पंक्तिनी वातावरण बदलून जात असे. आर्यांच्या या देशावर म्लेंच्छांचा हल्ला झाला आहे, हे शिवराजा सावध हो, ही आपली भुमाता तुला करुण विलाप करीत हाक मारत आहे तो विलाप तुझ्या हृदयाला अजून भेदून गेला नाही काय? राक्षसांचा वध करणारी श्री जगदंबा दशमुख रावणाला मर्दुन श्रीरामांच संरक्षण करते तीच पुण्य भूमाता म्लेंच्छाकडून छळली जात असताना ह शिवराया तुझ्याशिवाय तिला तारणारा दुसरा कोण आहे ? हे शिवराया साधूंच, सज्जनांच रक्षण आणि दुष्कर्म करणाऱ्यांचा नाश करायला आणि पुन्हा एकदा भगवतगीता सार्थ करायला आपण या. देशाच्या उद्धारासाठी शिवनेरीवर जन्म घेणाऱ्या आणि देशासाठीच रायगडावर देह ठेवणाऱ्या, देश स्वातंत्र्याचा जो दाता आहे त्या श्री शिवराजाचा जयजयकार करूया. अशा अर्थांचे हे काव्य संपूर्ण जनमानसाला स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्यास प्रवृत्त करत होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १९०४ साली नरवीर तानाजी यांच्यावरील सिंहगडचा पोवाडा आणि १९०६ बाजी देशपांड्यांच्या पोवाडा लिहला. त्यातून स्वराज्य चळवळ प्रेरित होऊ लागली. `स्वराज्य’ शब्द त्या काळात `होमरूल’ या अर्थाने वापरला जात असला तरी तो उच्चारणेदेखील राजद्रोह मानला जात असे. त्यामुळेच लोकमान्य टिळक, डॉ. अॅनिबेझंट यांना ब्रिटिशांनी राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात ठेवले होते. अशा परिस्थितीत संपूर्ण स्वातंत्र्य हे ध्येय ठेवून त्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांती घडविण्याचा विचार स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तानाजीवरील पोवाड्यातून मांडणे ही फार मोठी क्रांती होती. कुमार वयातच त्यांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत या गुप्त संघटनेत मित्रमेळा ही एक शाखा होती. शाखेच्या वतीने शिवजयंती तसेच गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक कार्यक्रमात हे पोवाडे सादर केले जात. स्वातंत्र्यवादी नि सशस्त्र क्रांतिकारी उपदेशाचे तसेच ऐतिहासिक प्रसंगाचे त्यातून सादरीकरण केले जाई. या कार्यात स्वातंत्र्यकवी गोविंद हेदेखील सावरकरांना संवाद, पद्ये यातून स्फूर्ती देत. फर्ग्युसन कॉलेजमध्ये संमेलनाच्या वेळी स्वतः सावरकरांनी पोवाडा गायला होता. त्यावेळी उपस्थितांनी त्यांची क्रांतिशील स्फूर्तीदेखील अनुभवली होती.
सिंहगड आणि बाजी देशपांडे हे दोन्ही पोवाडे पहिल्यांदा म्हणावयास निवडलेली पंधरा-सोळा वर्षांच्या आतील मुले तेजस्वी बाण्याची होती. स्वतः सावरकर या मुलांना अभिनय शिकवत तसेच चाल बसवून देत. कवी गोविंद हेदेखील अनेकदा उपस्थित राहून सूचना करत. त्यामुळे त्यांचे सादरीकरण आवेशपूर्ण आणि परिणाम करणारे ठरत असे. दत्तू, श्रीधर नि बाळ ही त्यांची त्यावेळची नावे नंतरच्या काळात प्रा. दत्तोपंत केतकर, अधिवक्ता श्रीधरपंत वर्तक आणि डॉ. नारायणराव सावरकर अशी लौकिकप्राप्त झाली. अभिनव भारतच्या बालशाखेतील अनेक मुले पोवाडा सादरीकरणात सहभागी असायची. हुतात्मा कर्वे आणि देशपांडे देखील या बालशाखेत पोवाडा गात. पोवाड्यांच्या गायनाने खाडिलकर, नानिवडेकर, जवखेडकर आदी शाहीरदेखील प्रसिद्ध झाले. या मुलांना पोवाड्यांतील प्रत्येक शब्दांचे मर्म कळत असल्यामुळे त्यांच्या हृदयातच पोवाड्यातील स्वातंत्र्यस्फूर्तीची ज्वाळा धगधगत असायची आणि गाताना समोरच्याच्या मनावर परिणाम करायची. अभिनव भारतच्या शाखाशाखांवर या पोवाड्यांनी परकीयांविरुद्ध आग ओकली. यामुळे अनेकांना ब्रिटिशांच्या छळांना सामोरे जावे लागले. या पोवाड्यांतून उपस्थितांना जाज्वल्य संदेश मिळत असे. शिवरायांप्रमाणे लढण्याची प्रेरणा मिळत होती.
नाशिकमध्ये १९०५-०६ च्या सुमारास सार्वजनिक गणेशोत्सवात हे दोन्ही पोवाडे गायले गेले. या कार्यक्रमाची माहिती सर्वदूर पसरू लागली. अनेकजण कार्यक्रमाला गर्दी करायला लागली. त्यांच्यात वीररसाने भरलेले हे पोवाडे ऐकून पारतंत्र्याची चीड निर्माण व्हायला लागली होती. हळूहळू हे वृत्त पुण्यापर्यंत पोहचले. काळकर्ते शिवराम महादेव परांजपे यांनी या मुलांना पुणे येथे बोलावले आणि सार्वजनिक गणेशोत्सव सोहळ्यात त्याचे सादरीकरण करण्यास सांगितले. गायकवाड वाड्यातील गणपतीसमोरील कार्यक्रमास स्वतः लोकमान्य टिळक उपस्थित राहिले होते. त्यांनीही भारावून मुलांचे कौतुक केले. हे सादरीकरण जिथे व्हायचे तिथे श्रोत्यांचे मोठमोठे जमाव या कार्यक्रमास उपस्थित रहात असत.
या कार्याचा प्रभाव ओळखून लोकमान्य टिळकांनी रायगडावर होणाऱ्या शिवोत्सव सोहळ्यात पोवाड्यांचे सादरीकरण करण्याचे ठरवले. मुंबईचे प्रख्यात विधिज्ञ दाजी आबाजी खरे यांना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलावले. त्यावेळची आठवण तत्कालीन परिस्थिती समजून घेण्यास पुरेशी आहे. लोकमान्य टिळक, काळकर्ते परांजपे यांच्या उपस्थितीत पोवाडे गाण्याचा कार्यक्रम सुरु झाला. जहाल क्रांतिकारक विचार त्यातून बाहेर पडू लागल्यामुळे श्री. खरे यांना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणे अस्वस्थ करू लागले. जेव्हा बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा सुरु झाला आणि पहिले तेजस्वी कडवे रंगत रंगत त्याचे शेवटचे चरण तुम्ही मावळे बोला, हर हर महादेव बोला, हे गायल्यानंतर तिथे जमलेल्या अभिनव भारतच्या अनेक गुप्त क्रांतिकारकांसह शेकडो देशभक्त उत्सफूर्तपणे घोषणा देऊ लागले. चारी बाजूंनी `हर हर महादेव’ असा आवाज घुमू लागला. तेव्हा श्री. खरे यांनी आपण यापुढे अध्यक्षस्थानी राहून लोकांच्या या वर्तनाची जबाबदारी घेऊ इच्छित नाही, तरी कार्यक्रम बंद करावा, असे लोकमान्य टिळक यांना सांगितले. त्यानंतर लोकमान्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष आता प्रवासामुळे थकले असून मी त्यांना घेऊन जातो तरी पुढील कार्यक्रम काळकर्ते परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली होईल, असे जाहीर केले. त्यानुसार पुढे कार्यक्रम सुरु राहिला.
बाबाराव सावरकर यांनी १९०६ साली पोवाडे मुद्रित केले आणि महाराष्ट्रातील लाखो स्त्री-पुरुष देशभक्तांपर्यंत ते पोहचले. त्यातून अनेकांना प्रेरणा मिळत गेली. हे ब्रिटिशांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब सर्व मुद्रित साहित्य जप्त करून त्याची जाहीर होळी केली. त्यानंतर हे पोवाडे कुणी म्हटले तरी त्याला शिक्षा दिली जात असे. पण अनेकांनी त्याच्या हस्तलिखित प्रती करून घरी ठेवल्या होत्या. ही माहिती मिळाली की ब्रिटिशांकडून हस्तलिखितही जप्त केले जात असे. हे साहित्य ज्याच्याकडे मिळायचे, त्याला अभिनव भारत संघटनेत सहभागी असल्याचा सबळ पुरावा समजून कारवाई केली जात असे. अनेकांना त्यामुळे शिक्षा ठोठावण्यात आल्या. इतके अत्याचार सहन करूनही ही शिवकालीन काव्ये जिवंत राहिली याचे कारण म्हणजे अनेकांनी त्याचे पाठांतर केले होते. धार्मिक कार्यक्रम तसेच गृहमंगल सोहळे, शाळा आणि कॉलेजमधील संमेलने यात हे म्हटले जात असत. या पोवाड्यांवरील बंदी उठवली जावी, अशी मागणी जाहीर सभांमधून करण्यात येत असे. न. चिं. (तात्यासाहेब) केळकर यांनीही सिंहगडच्या पोवाड्याचे चरण जाहीर सभेत बोलून तशी मागणी केली होती.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती, स्फूर्तीगीत तसेच तानाजी आणि बाजीप्रभूंवरील पोवाडे ही शिवकालीन काव्ये वीररसांनी परिपूर्ण आहेत. ज्या काळात ही काव्ये रचली गेली तेव्हा समाजात शिक्षण संस्कार वाढू लागले होते. शिवकाळात स्वातंत्र्य किंवा स्वतंत्रता या शब्दांऐवजी राजभक्ती आणि धर्मभक्ति अशी परिभाषा प्रचलित होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी समकालीन परिस्थितीत लिहलेली शिवकाव्ये लोकांपर्यंत थेट पोहचत होती. वीरपराक्रमाचे वर्णन करून लोकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा त्यांचा हेतू सार्थकी ठरत होता. त्यामुळे त्यांची वीरकाव्ये स्वातंत्र्यचळवळीला अधिक बळकट करत होती.
रत्नागिरी येथे स्थानबद्धतेत असताना १९२६ साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांना स्वातंत्र्यलढ्यावर मर्यादा असूनही शिवरायांचे स्फूर्तीगीत लिहून क्रांतिकार्याला प्रेरणा दिली. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर या देशात औषधालाही हिंदू मिळाला नसता, इतकी आक्रमणे झेलूनही त्यांनी धर्म टिकवून ठेवला. त्यामुळेच आता आपल्याला स्वातंत्र्यासाठी त्यांच्यापासून स्फूर्ती घेत स्वातंत्र्यलढा उभारला पाहिजे, असा संदेश त्यांनी त्यातून क्रांतिकारकांना दिला. त्यांच्या तेजस्वी लेखणीतून साकारलेले हे काव्य आजही मरगळलेल्या मनाला स्फूर्ती आणि चैतन्य देणार आहे. यातील प्रत्येक कडव्यात आणि प्रत्येक शब्दांत महाराजांच्या कार्याची महती सांगितली आहे. ज्या पद्धतीने महाराजांनी यवनांकडून स्वराज्य मिळवले, त्याप्रमाणेच बुद्धी, शक्ती आणि युक्ती आमच्याही ठायी येऊ दे, असे मागणे त्यांनी यातून केले आहे. हिंदु धर्म सरंक्षक छत्रपती शिवाजी महाराजांकडून हिंदु संघटक सावरकरांना नेहमीच प्रेरणा मिळाली, हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा, या गीतातून त्यांनी संस्कृतप्रचुर शब्दांची वापर करत शिवरायांच्या कार्याचे वर्णन केले आहे. आदर आणि भावना यांनी ओतप्रोत भरलेल हे गीत आजही तितकच स्फूर्तिदायी आहे.
सकल हिंदुंच्या शक्तितून निर्माण झालेल्या तेजा, हिंदुंच्या तपस्येतून (फळ म्हणून) अवतरलेल्या ईश्वरी अवतारा आणि हिंदु श्री देवतेच्या सौभाग्याचा अलंकार असणाऱ्या हे हिंदु नृसिंहा शिवाजी राजा तुला वंदन करतो. हे हिंदुराष्ट्र तुला वंदन करते आहे, आमचे अंतकरण तुला आदराने अभिनंदन करते आहे, तुझ्या चरणावर आम्ही चंदनचा लेप करतो आहे, ज्या गूढ आशा माझ्या मनामध्ये आहेत ज्या मी तुला सांगू शकत नाही ( स्थानबद्धतेत सावरकरांना राजकारण करण्यास बंदी होती त्यामुळे स्वातंत्र्याची इच्छा बोलून दाखवणं ही शक्य नव्हतं म्हणून गूढाशा) त्या तू पूर्ण कर. सर्व गडांचा तट भंगला आहे, हा जयदुर्गही भग्न होऊन (शत्रुविरुध्द विजय मिळत नसल्याने जयदुर्ग भंगला आहे) दुःखाश्रू ढाळतो आहे , महाराज तुमच्यासारखा वीर कुणी नसल्यामुळे भवानी तलवारीची धार गंजली आहे, म्हणून ती आई भवानीही कुणाला आधार देत नाही. (प्रयत्न न करणाऱ्या भक्तांना देवी मदत करत नाही) सर्व गड आणि जलदुर्ग भंगले आहेत, हे हिंदु नृसिंहा शिवाजी राजा (तू ही दुर्दशा बघ) असे त्यांनी त्यात म्हटले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली शिवकाव्य ही क्रांतिकार्याला बळकटी आणण्यासाठी कृतीशील ठरलीच होती परंतु संकटाच्या काळात त्यांनी आत्मबल वाढविण्यासाठी लिहिलेल्या या महान साहित्यकृती आहेत. हीच काव्ये जेव्हा आपण आजही वाचतो तेव्हा आपलीही मानसिक शक्ती, सकारात्मक वृत्ती बळकट होते इतके त्यात सामर्थ्य आहे. म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विपुल साहित्यसंपदेत त्यांनी लिहिलेली ही शिवकालीन काव्यांची साहित्यकृती अजरामर ठरणारी अशीच आहे.
– अशोक रामचंद्र शिंदे (ज्येष्ठ पत्रकार, मुंबई)
संपर्क : ९८२१३७४६२६








